नवी मुंबईहून नाशिक आणि घोडबंदरच्या दिशेने जाण्याकरिता टोलचा जाच चुकवण्यासाठी शेकडो वाहनचालक
विटावा-कळवा मार्गाचा वापर करतात. त्यामुळे दिवसेंदिवस या मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढत आहे. ही वर्दळ
कमी करणे; विटावकरांना मुंबई गाठण्यासाठी थेट पश्चिम द्रुतगती महामार्ग गाठणे सोयीचे व्हावे, यासाठी
कळवा-विटाव्यातून ठाणे रेल्वे स्थानक तसेच कोपरी, पूर्व द्रूतगती महामार्गाच्या दिशेने हलक्या
वाहनांच्या वाहतुकीसाठी खाडीवर पूल उभारण्याची योजना साकारली जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात जाणाऱ्या बांधवांसाठी हा खाडीपूल सोयीचा होणार आहे. तीन ते चार
वर्षांच्या पाठपुराव्यानंतर खाडीवरील हा पुल उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या पुलाचे काम मुंबई
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या पुलामुळे ऐरोली, आनंदनगर, कळवा, विटावा
भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणारच आहे. शिवाय, वागळे इस्टेट, ठाणे शहरातील नागरिकांनाही
कोपरीमार्फत प्रवास करणे सोयीचे होणार आहे.