नवी मुंबईच्या वेशीवर असूनदेखील विटावा गावाकडे कायम दुर्लक्ष केले गेले. कोणत्याही प्रकारचे नियोजन न
करता भू माफियांनी चाळी आणि इमारती बांधल्या अन बघता बघता हा परिसर अनधिकृत बांधकामांनी व्यापला.
एमआयडीसीसह गावठाणावर बांधलेल्या या बांधकामांचा दर्जा देखील निकृष्ट आहे. एखादी दुर्घटना घडल्यास
अग्रिशमन दलाची गाडीच काय रुग्णवाहिकादेखील दुर्घटनास्थळी पोहचू शकणार नाही, अशीच काहीशी अवस्था
आहे.
काही वर्षापूर्वी एमआयडीसीने या भागातील रहिवासांना नोटीस पाठवून सदरचा भूखंड मोकळा करण्याची कार्यवाही
करण्याचे योजले होते. मात्र, हजारो विटावकरांना वार्यावर सोडणे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अमान्य करीत
रणशिंग फुंकले त्यांनी येथील एकाही घरावर एमआयडीसीला हातोडा चालवू दिला नाही.
आताची स्थिती पाहता, एमआयडीसीच्या या भूखंडांवर कोणत्याही प्रकारचे कारखाने उभारले जाण्याची शक्यता कमीच
आहे. किंबहुना, यापुढे या परिसरात कारखाने उभारूच देणार नाही, याची जाणीव असल्यानेच डॉ. जितेंद्र आव्हाड
यांनी म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी एमआयडीसी प्राधिकरणाशी चर्चा बैठकांचे सत्र सुरु आहे. याठिकाणी प्रस्तावित स्वतंत्र उपनगर
उभारल्यानंतर विटावा, सूर्यनगर मध्ये राहणाऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काची अधिकृत घरे मिळणार आहेत.